सन १९५७. दिल्लीहून निघालेली एक रेल्वे भोपाळच्या दिशेने वेगात निघाली होती. या गाडीचा वेग भोपाळ स्टेशन येण्याआधी थोडा कमी झाला होता.आणि अचानक त्या गाडीतून एका तरुणाने उडी मारली आणि समोर दिसणाऱ्या डोंगराच्या दिशेने धावत सुटला. गाडीतल्या प्रवाशांनी त्याच्याकडे एक तुच्छ नजर टाकली आणि गाडीने पुन्हा वेग घेतला. ही विचित्र गोष्ट करणारा तरुण म्हणजे डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर. अर्थात हरिभाऊ वाकणकर. भारतातील सर्वात पुरातन शैलाश्रय (rock shelter) शोधणारे पुरातत्वशास्त्रज्ञ.
मानवी संस्कृतीचा उगम शोधण्याची धडपड ही अशा अभ्यासकांकडून अव्याहतपणे सुरू आहे. संस्कृतीचा हा उगम, विकास आणि ऱ्हास शोधण्याचे कुतूहल कालातीत आहे. Indology म्हणजे भारतविद्या/भारतशास्त्र ही विद्याशाखा या कुतूहलाला संशोधनाचा भक्कम आधार देते. या शास्त्रात मुख्यतः प्रागैतिहासिक कालखंड ( prehistoric age) ते साधारणपणे १२ वे शतक ( मुघलांची आक्रमणे सुरू होण्याआधी) या कालखंडाचा अभ्यास केला जातो. आणि हा प्राचीन भारत या अभ्यासाच्या केंद्रस्थानी आहे.
या शाखेच्या आधारे इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या खुणा अभ्यासणं हे मोठं रंजक काम आहे.
आदिम संस्कृतीच्या पाऊलवाटेने निघालेली ही इतिहासाची शाखा १२ व्या शतकापर्यंत येता येता एका देखण्या राजमार्गाचं रूप धारण करते. इतिहासाच्या या वाटेवरचा हा प्रवास मोठा अद्भुतरम्य आणि विलक्षण अनुभव देणारा आहे.
या इतिहासाच्या रंजक वाटेवरून चालताना अनादि कालौघाचे अनेक मूक साक्षीदार आजही उभे आहेत. अनेक स्थित्यांतरातून जाऊन ही हे साक्षीदार काळाची एखादी कडी सांभाळत आहेत. अशा अनेक सुट्या कड्यांना एकत्र जोडण्याचं काम संशोधकांकडून सुरू आहे.
भीमबेटका. मध्य प्रदेशातील रायसेना जिल्ह्यातील एक प्रागैतिहासिक स्थळ. आज जागतिक वारसा म्हणून प्रसिद्धी पावलेले. रेल्वे मधून उडी मारून हरिभाऊ वाकणकरांनी शोध लावलेले हेच ते ठिकाण. विंध्य पर्वतराजीमध्ये असणारे सुमारे आठशे शैलाश्रय ( rock
shelters).इथे आहेत. त्यापैकी पाचशे गुहांमधून चित्रे काढलेली आढळतात. ही चित्रे भिन्न कालखंडातील आहेत. सर्वात जुनी चित्रे सुमारे ३०,००० वर्षांपूर्वीची आहेत. त्यानंतरही आदिमानवाची वस्ती इथे होती आणि त्या वेळच्या जीवनशैलीचे प्रतिबिंब या चित्रांमधून दिसते. ही चित्रे तत्कालीन मानवाच्या जीवनावर काहीसा प्रकाश टाकतात. यामध्ये, बैल,हत्ती,वाघ,हरीण,गेंडा यासारखे प्राणी जसे चितारले आहेताहेत तसेच अनेक मानवी आकृत्या आणि त्यांच्या विविध कृतीही या चित्रांतून आपल्या समोर येतात. त्याचप्रमाणे शिकार, मृतदेहाचे दफन, सामूहिक नृत्य , पाठीला टोपली लावून अन्नाच्या शोधार्थ जाणाऱ्या स्त्रियांची चित्रे आणि या स्त्री प्रतिमांनी धारण केलेले अलंकार देखील या चित्रांमधून दिसतात.
तरीही भीमबेटका ही भारतातील प्रागैतिहासिक कालखंडाची काही पहिली कडी नाही. या कालखंडाचे पुरावे मुख्यतः भौतिक ( physical) किंवा अलिखित असतात. म्हणजे असे शैलाश्रय, दगडी हत्यारे, मातीची भांडी, दफन स्थळे ,शिल्पे. प्रागैतिहासिक काळाचा लिखित पुरावा अजून सापडला नाहीये. ज्या काळाचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत तो प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो. इतिहासाचा अभ्यास आणि भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सत्यासत्यता ही त्याकाळच्या उपलब्ध पुराव्यांवरून ठरते.हे पुरावे संशोधकांना भौतिक आणि लिखित अशा दोन प्रकारांत अभ्यासावे लागतात. यामध्ये उत्खननात सापडलेली भांडी, अलंकार, नाणी, शस्त्रे, दफने, घरे हे भौतिक पुरावे आहेत. तर विविध बखरी,भूर्जपत्रांवरील साहित्य, शिलालेख, ताम्रपट, हे लिखित पुरावे आहेत.
भारतविद्येचा अभ्यास करताना असे अनेक पुरावे आजपर्यंत भारताचा प्राचीन आणि तेजोमय इतिहास उलगडून दाखवत आहेत. भीमबेटकाच्या शैलाश्रयापासून ते खजुराहोच्या मन्दिर समूहांपर्यंत आणि इ. स. पूर्व ३ऱ्या शतकात लिहिल्या गेलेल्या शिलालेखांपासून ते पेशवे कालीन बखरींपर्यंत प्राचीन भारताच्या इतिहासाच्या पाऊलखुणा गतवैभवाची साक्ष देतात. या पुराव्यांमधून भारतीय इतिहासाचा एक अखंड प्रवाह जगासमोर आणण्यासाठी भारतविद्या (Indology) आणि पुरातत्वविद्या (Archaeology) या शास्त्रांचा अभ्यास अतिशय महत्वाचा ठरतो.
अशा प्राचीन कालखंडाचा काळाच्या प्रवाहात लुप्त झालेला भारतीय संस्कृतीचा महत्वाचा तुकडा एका अपघातानेच हाती आला. त्या आधारावर एका प्राचीन, भव्य आणि पूर्णत्वाला पोचलेल्या संस्कृतीचे देखणे चित्र साकार झाले. या चित्राने जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांचे डोळे दिपले. या अपघातानंतर भारतातील Indology च्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.
- विनिता हिरेमठ